गुवाहाटी – भारतीय जनता पक्षाचा आसाम मधील निवडणुकीच्या संबंधातील जाहीरनामा आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नढ्ढा यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यात नागरीकत्वाच्या राष्ट्रीय नोंदणीत झालेल्या चुका दूरूस्त करून भारतीय नागरीकांना भारतातच राहण्याचा अधिकार दिला जाईल आणि घुसखोरांना बाहेर काढले जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. आसामातील नागरीकांच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्याचे आश्वासनही यात देण्यात आले आहे.
या जाहीरनाम्यात दहा वचने देण्यात आली आहेत.आसामातील प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिले जाईल, पूरनियंत्रणासाठी कायम स्वरूपी यंत्रणा प्रस्थापित केली जाईल, महिलांना ओरूंदाई योजनेतून सध्या जे, 830 रूपयांचे अनुदान दिले जाते ते तीन हजार रूपये इतके केले जाईल अशी आश्वासने देण्यात आली आहेत. आसामात योग्य वेळी सीएए कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असेही भाजपने म्हटले आहे.