नवी दिल्ली – कोळसा खाणवाटप प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आज 169 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. टॉपवर्थ उर्जा आणि मेटल्स लिमिटेड (पूर्वाश्रमीची श्री विरांगना स्टील लिमिटेड) या कंपन्यांना पूर्व महाराष्ट्रातील मार्की मांगली-2,3 आणि 4 क्रमांकाच्या कोळशाच्या खाणींचे वितरण होण्याचा तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
या कंपन्यांनी या कोळसा खाणी फसव्या मार्गाने आणि बनावटगिरी करून मिळवले असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालयाने केला आहे. मार्की मंगली 2 आणि मार्की मंगली 3 कोळसा खाणींचे वाटप बेकायदेशीरपणे झाले असल्याने संबंधित कंपनीला 169.64 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, असे “ईडी’ने म्हटले आहे. बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेल्या कोळशाच्या खाणीतून 2011-12 ते 2014-15 या कालावधीमध्ये 9,211,748 मेट्रीक टन कोळशाचे उखनन करण्यात आले.
या खाणींच्या माध्यमातून या कोळशाच्या उत्खननाच्या आधारे कमावलेले 52.50 कोटी रुपयांचे उत्पन्नही बेकायदेशीर आहे. त्यातून कंपनीला कोळशाच्या विक्रीतून अतिरिक्त उर्जानिर्मितीतून मिळालेला 20.40 कोटी रुपयांचा फायदाही कंपनीने मिळवला आहे, असेही “ईडी’ने म्हटले आहे. मनी लॉन्डरिंग विरोधी कायद्यांतर्गत जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये नागपूरमधील शेतजमीन, पडीक जमीन आणि काही फॅक्टरींमधील यंत्रसामुग्रीचा समावेश आहे.
कोळशा वाटप प्रकरणी मनी लॉन्डरिंगचा तपास “ईडी’ कडून आणि भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांचा तपास सीबीआयकडून केला जात आहे.