नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. त्यातही उत्तर प्रदेशची सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीचे कल समोर आल्यानतंर पाच पैकी चार राज्यात भाजपने आपली आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुपडा साफ करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यातच या सर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“उत्तर प्रदेशच्या निवडणूकचा प्रभाव महाराष्ट्र पडत नाही,”असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच या निवडुकीपेक्षा महाराष्ट्रतील निवडणुकीचा आणि राज्यातील घडामोडींचा प्रभाव देशावर पडतो. नवीन तंत्रज्ञान आणि युवकांना उमेदवारी देण्याचा प्रमाण वाढवायला पाहिजे, असे मत यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल.