Election Dates : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सत्तेसाठीची महालढाई सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, निवडणूक होणाऱ्या राज्यांमध्ये मतदार यादीची विशेष सघन पुनरावृत्ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. तसेच आयोगाने सर्व राज्यांना भेट देत तयारीचा आढावा घेतला आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून सूचना घेतल्या. आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक आणि इतर अंमलबजावणी संस्थांच्या नोडल अधिकाऱ्यांशीही बैठक घेतल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय संबंधित राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्याशीही चर्चा करण्यात आली. कोणत्या राज्यात कधी मतदान? आसाम – ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान, निकाल ४ मे केरळ- ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान, निकाल ४ मे पुद्दुचेरी -९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान, निकाल ४ मे पश्चिम बंगाल – २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान, निकाल ४ मे तामिळनाडू- २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान, निकाल ४ मे या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी सुमारे १७.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून सुमारे २.१९ लाख मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत जवळपास २.५ कोटी निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.