Pune District : सर्वपक्षीय इच्छुकांनी पायधूळ झाडली ; राष्ट्रवादीच्या मुलाखतीत जोरदार शक्तीप्रदर्शन
त्याचप्रमाणे (स्व) अजितदादांना डोळ्यासमोर ठेवून, पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करण्यासाठी व शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बाजार समिती ही आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे.

रांजणगाव गणपती : शिरूर बाजार समितीच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली असून राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य वाढल्याने वाहत्या पाण्यात इच्छुक हात धुणार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
रांजणगाव येथे मानसिंग पाचुंदकर यांनी पुढाकार घेत मुलाखतीचे नियोजन केले होते. पाचुंदकर यांनी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार माऊली कटके यांच्यासह तालुक्यातील मातब्बर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखतीचे नियोजन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजार समितीची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. हे स्पष्ट झाले.
महाराष्ट्र राज्याच्यक केंद्रस्थानी महायुतीमधील घटक पक्ष आहेत. शिरूर तालुका हा राष्ट्रवादीला मानणारा आहे. त्यात सत्तेत सहभागी असल्याने इच्छुक उमेदवार हे सत्तेच्या मांडवाखाली जाण्यासाठी धडपड करीत आहेत. हेच या मुलाखतीमधून स्पष्ट झाले आहे. बाजार समितीसाठी काटा लढती होण्याची शक्यता आहे. त्यात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे, भाजप, शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हे मुलाखतीत पायधूळ झाडून गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी भाजप, शिवसेना, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीची हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. त्या उमेदवारांचे प्राबल्य पाहून त्यांना उमेदवारी देणार काय, यावर खलबते होऊ शकतात. बाजार समितीच्या निवडणुकीची ही पहिली मोठी राजकीय चाचपणी मानली जात असून, येत्या काही दिवसांत तालुक्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
उमेदवारी देताना कसोटी लागणार?
विशेष म्हणजे मुलाखतींसाठी विविध पक्षांतील इच्छुकांची झालेली उपस्थिती पाहता उमेदवारी वाटपावेळी अनेक ठिकाणी चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही मतदारसंघांमध्ये एकाच पक्षाकडून अनेक दिग्गज इच्छुक रिंगणात असल्याने पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाची राजकीय गणिते जुळणार आणि कोणाला प्रतीक्षा करावी लागणार याबाबत तालुकाभर उत्सुकता निर्माण झाली आहे. मुलाखतींनंतर आता इच्छुकांच्या भेटीगाठी, शक्तिप्रदर्शन आणि राजकीय हालचालींना आणखी वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.





