Ashwini Vaishnaw : डिजिटल माध्यमांनी आता केवळ मध्यस्थ म्हणून न राहता एका शक्तिशाली माध्यम संस्थेचे रूप धारण केले आहे. त्यामुळे, आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या मजकुराची पूर्ण जबाबदारी या कंपन्यांनी स्वीकारलीच पाहिजे, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी केले. गुरुवारी नवी दिल्लीत आयोजित डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या परिषदेत ते (Ashwini Vaishnaw) बोलत होते. यावेळी त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मूळ आशय निर्माते यांच्यातील महसूल वाटणीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. डिजिटल क्रांतीच्या युगात आशय निर्माते, वृत्तसंस्था, संशोधक आणि अगदी दुर्गम भागातील प्रभावशाली व्यक्ती (इन्फ्लुएन्सर्स) रात्रंदिवस कष्ट करून माहिती तयार करतात. मात्र, जर या निर्मात्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला आणि योग्य महसूल मिळाला नाही, तर भविष्यात नाविन्यपूर्णतेला मोठी खीळ बसेल. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मनी आपल्या वाटाघाटीच्या धोरणांचा फेरविचार करावा, असा सल्ला वैष्णव यांनी दिला. जर या कंपन्यांनी स्वतःहून पावले उचलली नाहीत, तर जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही कायदेशीर मार्ग अवलंबले जातील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील वाढत्या असुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करताना मंत्री म्हणाले की, इंटरनेट आता केवळ माहिती देवाणघेवाणीचे साधन उरलेले नाही. ते आता एक जबाबदार माध्यम बनले आहे. ज्याप्रमाणे एखादा हॉटेल व्यवस्थापक आपल्या पाहुण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो, त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मनी त्यांच्याकडे पोस्ट होणाऱ्या मजकुराची शहानिशा करणे गरजेचे आहे. विशेषतः मुलांची सुरक्षितता आणि अश्लीलतेपासून संरक्षण ही या प्लॅटफॉर्मची प्राथमिक जबाबदारी आहे. एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवरही वैष्णव यांनी कडाडून टीका केली. कोणत्याही व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा व्यक्तिमत्त्वाचा वापर करून तयार केलेला कृत्रिम मजकूर त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय प्रसारित करणे हा गुन्हाच आहे. डीपफेकच्या माध्यमातून पसरवली जाणारी चुकीची माहिती समाजातील संस्थांवरील विश्वास नष्ट करत आहे. हा केवळ भारताचा प्रश्न नसून संपूर्ण जगाला ग्रासणारी ही मोठी समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी, डिजिटल क्षेत्रातील अल्गोरिदम हे वापरकर्त्यांना व्यसनाधीन करण्यासाठी डिझाइन केलेले असतात, असा आरोप करत त्यांनी ऑनलाइन गेमिंग आणि सायबर फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन केले. काळाची पावले ओळखा आणि समाजाचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारीने वागा,असे आवाहन करत त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मना या परिवर्तनाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.