Harshvardhan Patil । Ashok Chavan : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जावंच लागेल असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
जनतेच्या मनात एकच आहे की मी निवडणूक लढवली पाहिजे. मी नुकताच शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनीही मला सांगितले की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात.
त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन. हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन. असेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. एकेकाळी काँग्रेस पक्षात त्यांचे सहकारी असलेल्या अशोक चव्हाण यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर स्पष्टपणे भाष्य केलंय. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, “इंदापूरची राजकीय परिस्थिती जी आहे, त्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेतला असेल. तो मतदार संघ अजित पवार यांचे निकटवर्तीय सध्या तिथे आमदार आहेत. त्यामुळे, स्वाभाविक आहे, तिकडे भाजपला जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असावा’, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, “मी माझ्या राजकीय विरोधकांना एवढेच सांगेन की, तुमचं अस्तित्व टिकायचं असेल तर माझं सुद्धा टिकू द्या, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जिल्ह्यामध्ये बरीचशी मंडळी फक्त अशोक चव्हाणवर टीका करून जगत आहे, त्यांना उद्देशून मी बोललेलो आहे. मी राहिलो तरच तुम्ही राहाल, असा चिमटा चव्हाण यांनी विरोधकांना काढला.