लातूर : वारकरी संप्रदायाचा समृद्ध आध्यात्मिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास पात्र आसल्याने, राज्य सरकार वारकरी परंपरेचे तत्वज्ञान जगभर पसरवण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय विभाग विविध आंतरराष्ट्रीय उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. औसा येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातील एक भक्ती चळवळ आहे, जी भगवान विठ्ठल यांच्या पूजेला समर्पित आहे. त्यांचे अनुयायी ज्यांना वारकरी म्हणून ओळखले जाते. ते पंढरपूरला तीर्थयात्रा करतात, जिथे एक भव्य भगवान विठ्ठलाचे मंदिर आहे. संत ज्ञानेश्वरांनी मानवतेच्या कल्याणाची कल्पना केली. वैश्विक शांती आणि सौहार्दासाठी प्रार्थना केली. वारकरी परंपरेने ही दृष्टी आपल्या भक्ती आणि शिकवणींद्वारे पुढे नेली आहे, असे ते बोलताना म्हणाले. संस्कृतिक कार्य संचलनालय संतांच्या ज्ञानाचा उत्सव साजरा करत असून, हा वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक प्रवास सुरु ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शेलार म्हणाले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, भारतीय संस्कृतीबाबतच्या दृष्टीकोनाचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र २०४७ पर्यंत पूर्णपणे विकसित राज्य बनण्यासाठी वचनबद्ध आहे. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य विभाग प्राचीन स्मारकांचे जतन करण्याचे तसेच राज्याच्या समृद्ध परंपरांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे.