गुवाहाटी -आसाममध्ये पोलीस भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. अशात ते प्रकरण मध्यप्रदेशातील व्यापमंपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी केला आहे. आसाममधील भाजप सरकार पेपर लीक घोटाळ्यात सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आसाम पोलीस दलातील उप-निरीक्षक पदाच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिका काही दिवसांपूर्वी फुटली. त्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली. पेपर लीक प्रकरणी आसाममधील भाजप नेता दिबान डेका संशयाच्या घेऱ्यात आला आहे. पेपर लीक करण्यामागे काही पोलीस आणि सरकारी कर्मचारी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या प्रकरणावर गोगोई यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली.
पेपर लीक करण्यामागे केवळ काही भाजप नेते किंवा निवृत्त पोलीस अधिकारी नाहीत. तर, पूर्ण भाजप आणि राज्य सरकार त्यामागे आहे, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. त्यांनी संदर्भ दिलेला व्यापमं घोटाळा 2013 मध्ये मध्यप्रदेशात उघडकीस आला. तो घोटाळा मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाकडून (व्यापमं) भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील गैरप्रकारांशी संबंधित होता. व्यापमं घोटाळ्याशी निगडीत असलेल्या तब्बल दोन डझन लोकांच्या गूढ मृत्युमुळे आणखीच खळबळ उडाली होती.