मुंबई – उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या राज्यातील चार यात्रेकरुंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि अपघातातील जखमींना ऋषिकेश येथील एम्स हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या चौघा यात्रेकरुंचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीश: लक्ष घालत ते मुंबईत आणले आणि नातेवाईकांकडे सुपुर्द केले.
पालघर जिल्ह्यातील 18 यात्रेकरू ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरुंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे (वय 43), वसई येथील धर्मराज खाटेकर (वय 40), पुरुषोत्तम खिलखुटी (वय 37), दहिसर येथील शिवाजी बुधकर (वय 53) या चौघांचा मृत्यू झाला. तर 14 यात्रेकरू जखमी झाले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने त्याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने उत्तराखंडमधील यंत्रणेशी संपर्क साधला आणि जखमींना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. एवढेच नाही तर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करून त्यांनी जखमींवर उपचाराची माहितीही घेतली.