मुंबई – कोविडच्या संकटात महाविकास आघाडीने काम करुन दाखवले. देश आणि राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असताना देखील आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आदरणीय खा. शरद पवार साहेब ( Sharad Pawar ), काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) आणि मा. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray )यांचे आशीर्वाद सोबत असेपर्यंत या महाविकास आघाडी ( Maha Vikas Aghadi ) सरकारला कोणताही धक्का लागणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
आज(बुधवार, 16 डिसेंबर) जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar )बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif )आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, पुर्वाश्रमीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे सहकारी आहेत त्यांच्या मनात आता वेगळी भावना निर्माण व्हायला लागली आहे. मधल्या काळात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आज राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विविध पक्ष, प्रांत आणि समाजघटकातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत.
मागील वेळेस विरोधकांकडून अनेक प्रलोभने, आमिषे दाखवून आमच्या पक्षातील नेत्यांना त्यांच्या पक्षात नेण्यात आले. काही लोकांना भीती दाखवून फोडण्याचा प्रयत्न झाला. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजून अनेक नेते तिकडे गेले होते. पण आता त्यांनाही आपण आघाडी सोडून का गेलो? असे वाटायला लागलेय, अशी सद्यस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशद केली.
जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांच्या विरोधात भाजप साहजिकच आमदार देईल. पण आम्ही तीनही पक्ष मिळून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही अजितदादांनी दिली.
सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी करत आहे. पश्चिम महाराष्ट्र हा पक्षाचा बालेकिल्ला आहे त्यात अधिक भरघालण्याचं काम करून मातंग समाज, बहुजन आणि गरीब-वंचितांना सोबत घेऊन आपण पक्ष वाढवण्याचं काम करूया, असं आवाहन उपस्थितांना केलं.