प्रभात वृत्तसेवा पुणे – मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्री व्यवहाराबाबत राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी पुन्हा जैसे थे आदेशच कायम ठेवला आहे. गोखले बिल्डर आणि जैन ट्रस्टने व्यवहार रद्द करण्यासाठी सहमती दर्शविली असून दोघांचे संयुक्त प्रतिज्ञा पत्रही सादर करावे लागणार आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी ३० आॅक्टोबरला होणार आहे.मुंबई येथे धर्मादाय आयुक्तांकडे मंगळवारी (दि.२८) जैन बोर्डिंग प्रकरणाबाबत सुनावणी झाली. यावेळी जैन ट्रस्ट संबंधित अर्जदारांच्या वतीने अॅड. योगेश पांडे उपस्थित होते. प्रतिवादी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एलएलपी यांच्या वतीने अनुक्रमे अॅड. इशान कोल्हटकर आणि अॅड. एन. एस. आनंद उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींनी जैसे थे आदेश कायम ठेवण्यात हरकत घेतली नाही. या दरम्यान अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, लक्ष्मीकांत खाबिया, स्वप्निल गंगवाल, महावीर चौगुले आदी उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींना त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी २० आॅक्टोबरला दिलेला जैसे थे (सध्यस्थिती कायम ठेवण्याचा) आदेश ३० आॅक्टोबरपर्यंत वाढविला आहे.जैन बोर्डिंग प्रकरणी काही दिवसांपूर्वी गोखले बिल्डरकडून हा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचा ई-मेल द्वारे कळवण्यात आले होते. त्यानंतर आता ट्रस्टच्यावतीनेही व्यवहार रद्द करण्यासही धर्मादाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या वकिलांनी दिली आहे. गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार आहे. हा व्यवहार वादग्रस्त ठरल्यानंतर जैन समाजाच्यावतीने धर्मादाय आयुक्तांकडे या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आजची सुनावणी पार पडली.गोखले बिल्डरच्या माघारीनंतर आता ट्रस्टने देखील जैन बोर्डिंगचा व्यवहार मोडीत काढण्याची तयारी दर्शवली आहे. जो काही व्यवहार सुरू होता तो आम्ही रद्द करण्याच्या तायरीत असल्याचे ट्रस्टच्या वकिलांनी सुनावणीवेळी सांगितले. या संपूर्ण प्रकरणा संदर्भातील कागदपत्र आली असून आम्हाला युक्तीवादापूर्वी अभ्यास करण्यासाठी १ ते २ दिवस मिळावे, अशी विनंतीही त्यांनी केली, ती मान्यही करण्यात आली.गोखले बिल्डर व ट्र्स्ट यांनी व्यवहार रद्द करण्याबाबतची तयारी दर्शविली असली तरी या दोघांनीही सुनावणीच्या वेळी त्याबाबत अर्ज सादर दाखल केले. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी अर्जात दुरुस्ती करून दोघांनी संयुक्त प्रतिज्ञा पत्रही सादर करण्याबाबत सांगितले आहे, अशी माहिती अक्षय जैन यांनी दिली. “आम्ही १४ मे महिन्या या दिवशी काही मोजक्या १० माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत ही लढाई सुरू केली होती. सुरूवातीला तीन महिने कोणीच सोबत नव्हते. लोकांना विश्वास बसत नव्हता आणि जसं-जसे डॉक्युमेंट्स समोर यायला लागले. सर्वच समाजातील लोकं सोबत यायला सुरूवात झाली. सर्वांच्या ताकदीमुळे हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.” – अक्षय जैन, तक्रारदार “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे या प्रक्रियेत आम्हाला योगदान मिळाले आहे. हा व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत अहिंसेच्या मार्गाने लढा सुरू राहणार आहे.” – लक्ष्मीकांत खबीया, तक्रारदार