पाथरी: शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील पाथरी येथे आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेला संबोधित केले. यावेळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर ताशेरे ओढले.
पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही पुढे जाण्याची संधी पवारसाहेबांमुळे मिळाली. शासकीय आणि खासगी क्षेत्रात महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र या युती सरकारच्या काळात महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, गुन्हेगारांवर कुठलाच अंकुश राहिलेला नाही, असा आरोप पवार यांनी केला.
आज राज्यात सर्वाधिक अन्याय हा मराठवाड्यावर होत आहे. मराठवाड्यासाठी हे सरकार काहीच करत नाही. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर गाजरं दाखवण्याचं काम या सरकारनं केलंय. अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस-सोयाबीन-तूर अशा अनेक धान्यांचा हमीभाव मिळालेला नाही. तर आजही तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत हे सरकार सामान्य जनतेवर अन्याय करत असल्याचे पवार यांनी सांगितले.
आज राज्याची परिस्थिती बिकट आहे. शिक्षक, पोलिस, तलाठी यांच्या जागा रिक्त आहेत. पण हे सरकार जागा भरतच नाही. फक्त सामान्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच राज्य सहकारी बॅंकेवर घोटाळ्याचा आरोप फडणवीस सरकारने केला. मात्र, निवडणूक जवळ येताच असे आरोप होणे स्वाभाविक असल्याचे पवार म्हणाले.
३३ कोटी झाडांपैकी एकतरी झाड कुठे दिसलं का? – धनंजय मुंडे
शिवस्वराज्य यात्रेतून महाराजांच्या विचारांचे, अठरापगड जातींचे राज्य स्थापन करण्याची भूमिका मांडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत असल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धंनजय मुंडे यांनी केले. एकीकडे मुख्यमंत्री सांगतात, आम्ही शेतकऱ्यांना विहिरी बांधून दिल्या, शेततळी दिली, ३३ कोटी झाडे लावली, या ३३ कोटी झाडांपैकी एकतरी झाड कुठे दिसलं का? जलयुक्त शिवाराचं काय झालं? असे सवाल मुंडे यांनी उपस्थित केले.