नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळयाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची अटक योग्य असल्याचे स्पष्ट करत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सीबीआयच्या खटल्यातील त्यांच्या अटकेविरोधात आणि याच प्रकरणातील जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. पण न्यायालयाने त्यांना ट्रायल कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे. न्या. नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने यावेळी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर नाही आणि सीबीआयने त्यांना कोणतेही कारण नसताना अटक केली, असे म्हणता येणार नाही. ईडीच्या ताब्यात असताना मुख्यमंत्री केजरीवाल यांना 26 जून रोजी सीबीआयने अटक केली होती. पण, मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता. ईडी आणि सीबीआयने अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे सांगितले. पण, आपकडून हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्ली सरकार अस्थिर करण्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे आपचे म्हणणे आहे.