पुणे – बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी दि. 3 ते 14 जूनपर्यंत अर्ज करण्याचा कालावधी आहे. तसेच, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन विद्यार्थ्यांनाही या परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
जुलै-ऑगस्टमधील परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या शाळा अथवा महाविद्यालयामार्फत भरावती. अर्ज करण्यास 3 जूनपासून सुरू होईल आणि 14 तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. विलंब शुल्कासह 15 ते 19 जूनदरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयांनी दि. 20 ते 24 जून या कालावधीत परीक्षेचे शुल्क बॅंकेत चलनाद्वारे भरावयाचे आहे. दि. 26 जून रोजी शाळांनी महाविद्यालयांकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइन घेता येईल. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2019 व फेब्रुवारी-मार्च 2020 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. अर्ज करण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.