शिमला – हिमाचल प्रदेश सरकार आणि सत्तारूढ कॉंग्रेससमोर पेच उभा करणारे बंडखोर आणि अपात्र ठरवण्यात आलेले आमदार नरमले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कॉंग्रेसवापसीसाठी उत्सुक असल्याविषयीचा दावा फेटाळून लावला.
उलट, कॉंग्रेसचे आणखी ९ आमदार संपर्कात असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे हिमाचलमध्ये केव्हाही राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे चित्र पुढे आले आहे.
हिमाचलमधील राजकीय संकटावर मात करण्यास कॉंग्रेस श्रेष्ठींना यश आल्याचे शुक्रवारपर्यंत मानले जात होते. मात्र, ६ बंडखोर आमदारांपैकी एक असणाऱ्या राजिंदर राणा यांनी शनिवारी आक्रमक भूमिका मांडली.
मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुखू दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत. आमच्यापैकी कुणाचीच कॉंग्रेसवापसीची इच्छा नाही. पक्षाचे बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे राणा पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
हिमाचलचे मंत्री विक्रमादित्य सिंह हरियाणातील पंचकुलात जाऊन बंडखोरांशी चर्चा करणार असल्याचेही सुखू यांनी म्हटले होते. त्यामुळे सिंह शिष्टाई करणार असल्याचे मानले गेले. मात्र, त्यासंदर्भातही राणा यांनी वेगळीच भूमिका मांडली.
सिंह यांनी आम्हाला पॅच-अप करण्याचे कुठलेही आवाहन केले नाही. उलट, सिंह यांची स्वत:ची नाराजी कायम आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सिंह यांच्या भूमिकेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिमाचलमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या एकमेव जागेसाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी अनपेक्षित विजय मिळवला.
कॉंग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपला मत दिल्याने ती उलथापालथ घडली. ती हिमाचलमधील कॉंग्रेस सरकारचे अस्तित्व धोक्यात आणणारी ठरली. अशात विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली.
त्यामुळे कॉंग्रेस आणि सरकारपुढील संकट तीव्र बनल्याचे मानले गेले. मात्र, कॉंग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांशी चर्चा केल्यानंतर सिंह यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर ते बंडखोर आमदारांची मनधरणी करणार असल्याचे वृत्त पुढे आले.
मात्र, हिमाचलमधील राजकीय संकट टळले नसल्याचे बंडखोरांच्या भूमिकेतून दिसून येत आहे. हिमाचल विधानसभेचे एकूण संख्याबळ ६८ आहे. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने त्या सभागृहाचे संख्याबळ ६२ पर्यंत खाली आले आहे.
तर, कॉंग्रेस आमदारांची संख्या ३४ इतकी झाली आहे. भाजपचे २५, तर ३ अपक्ष आमदार आहेत. अपक्षांनीही राज्यसभा निवडणुकीत भाजपला मदत केली होती. आता बंडखोरांच्या दाव्यानुसार कॉंग्रेसच्या काही आमदारांनी त्यांना साथ दिल्यास हिमाचलमधील सुखू सरकार अडचणीत येऊ शकते.