वाल्हे : श्री सोमेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील वाल्हे (ता. पुरंदर) येथील दोन शेतकऱ्यांचा सल्लग सात एकरांतील ऊस अज्ञाताने लावलेल्या आगीत भस्म झाला आहे. यामध्ये दोन शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वाल्हे (ता.पुरंदर) येथील बाळासाहेब सिदू भुजबळ, व सचिन बबन भुजबळ यांच्या वाल्हे -आडाचीवाडी मार्गावरील असलेल्या सल्लग असलेल्या एकूण सात एकर ऊसाच्या फडाला मंगळवार (दि.३०) दुपारी साडेतीन नंतर अज्ञाताकडून उसाच्या फडाला काडी लावल्याने सात एकर ऊस व ठिंबक सिंचन ची पाईपलाईन व सर्व प्लॅस्टिकचे पाइप जळून खाक झाले असून ठिंबक सिंचनच्या तीन एकरांतील ऊसाच्या फडातील संच जळून खाक झाल्याने बाळासाहेब भुजबळ या शेतकऱ्यांचे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी अल्प पर्जन्यमान होऊनही धाडसाने या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. १४ महिने या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, अतोनात कष्टाने कसाबसा ऊस जगविला होता. मंगळवारी साडेतीनच्या सुमारास बाळासाहेब भुजबळ यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने संपूर्ण शेत व्यापले. परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व धावले, परंतु वाऱ्यामुळे एका पाठोपाठ एक अशा दोन्ही शेतकऱ्यांचा सात एकर उसामध्ये आग पसरली. आगीचे रौद्ररूप पाहुन कोणीही काही करु शकले नाही. आगीत काही उस तुटून जायची वेळ आली होती; मात्र, अज्ञाताने ऊसाचे फड पेटवल्याने, या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून संबंधित प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अज्ञाताकडून ऊस पेटवल्याने,आमच्या तीन एकर ऊसामधील ठिंबक सिंचनचे सर्व पाइपलाइन, तीस पीव्हीसी पाइप व इतर साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये अडीच लाख रूपये नुकसान झाले आहे. २५ नाराळाची झाडे जळून खाक झाली आहेत. याबाबतची तक्रार वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात दिली असून, अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. -बाळासाहेब सिदू भुजबळ, नुकसानग्रस्त शेतकरी