मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने आज मनि लॉंड्रिंग प्रकरणात आणखी एक समन्स जारी केले आहे. त्यांना 18 ऑगस्ट रोजी ईडीच्या मुंबई ऑफिस मध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
देशमुख यांच्यावर बजावण्यात आलेले हे पाचवे समन्स आहे. मनि लॉंड्रिंग प्रकरणात त्यांचा आणखी जबाब घ्यायचा आहे असे नमूद करीत ईडीने त्यांच्यावर हे समन्स जारी केले आहे.
देशमुख यांनी या आधीचे समन्स धुडकावले आहे. आपल्यावर बजावण्यात आलेले समन्स अन्यायी आहे असे नमूद करीत देशमुख यांनी त्यानुसार ईडीच्या समोर पुन्हा उभे राहण्यास नकार दिला आहे. देशमुख यांचे चिरंजीव हषिकेश, आणि त्यांच्या सुनेलाही हजर राहण्याची नोटीस जारी करण्यात आली आहे.
आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या समन्सच्या विरोधात देशमुख यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती पण त्यांना या प्रकरणात कोणताही दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आपल्या याचिकेचा निर्णय झाल्यानंतर सीबीआयच्या समन्सवर आपण विचार करू असे देशमुख यांनी म्हटले होते.