कामगार चळवळीशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या अण्णासाहेब मगर यांचा पिंपरी चिंचवड या गावांना ग्रामपंचायत ते नगरपालिका विकास करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी हवेली तालुक्याचे आमदार असताना पिंपरी चिंचवड येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगांची घडी बसविण्याचे कार्य केले. त्यांच्या प्रयत्नांतून शहरात अनुकूल वातावरण निर्माण झाले आणि पिंपरी-चिंचवड हे उद्योगनगरीच्या रुपाने उदयास आले. स्थानिक प्रतिनिधी, नागरिक आणि उद्योजक यांच्या सलोख्याचे संबंध निर्माण केले. उद्योग वाढल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कामगार आले. त्यामुळे त्यांचा राहण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी व इतर सुखसुविधा मिळवून देण्यासाठी अण्णासाहेबांनी प्रयत्न केले. कामगारांच्या युनियनचे ते अध्यक्ष असताना त्यांनी कामगारांसाठी शिबिरांचे आयोजन केले. त्यांनी उद्योजक व कामगार यांच्यात समन्वय राखण्याचे मोठे कार्य केले.
कामगारांचे प्रश्न समजून घेऊन त्यानुसार नगराध्यक्ष झाल्यानंतर ध्येयधोरणांची आखणी करून शासनाकडून तसे प्रस्ताव मंजूर करून घेऊन प्रकल्पांची उभारणी केली. असे विविध प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्याचे काम अण्णांनी केले. त्यामुळे अण्णासाहेब कामगारांनी नेहमीच आपल्यातील एक वाटतात…
पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिकनगरी म्हणून संबोधण्यात येते. ते शहरात सुरू झालेल्या कारखानदारीमुळे. पिंपरी-चिंचवड शहरात 1950-1960 या कार्यकालात उद्योगधंद्यासाठी चांगले वातावरण होते. त्यामुळेच या पट्ट्यात शेकडो उद्योगांची स्थापना झाली आणि भरभराटीला आले. शहरात पहिली ऍम्युनेशन फॅक्टरी 16 डिसेंबर 1869 रोजी सुरू झाली. फॅक्टरीमुळे मूळ शेती व्यवसायाबरोबरच कारखान्यात काम करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली. पुढे 1954 साली पिंपरीत हिंदुस्थान ऍन्टिबायोटिक्स कंपनी सुरू झाली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने येथे औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. 1972 सालापर्यंत येथील औद्योगिक परिसर विकसित झाला. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर कामगारांना रोजगार उपलब्ध झाला. औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना कुशल कामगार म्हणून नोकरी मिळू लागली. तर कमी शिक्षण असणारांना गरजेनुसार नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे महाराष्ट्र व अन्य राज्यांतील नागरिकांनी या शहराकडे धाव घेतली. नोकरी मिळाल्याने ते याच भागात स्थिरावले. 1970-71 पर्यंतच्या काळ हा उद्योगधंदे आणि कामगार चांगल्या प्रकारे स्थिरस्थावर झाले. या काळात कामगारांची संघटना बांधणीचे काम सुरू होते. परंतु हाताला काही तरी काम मिळाले यातच बरेच कामगार खूश होते. त्यामुळे त्या काळात लढा, संघर्ष, संप अशा घटना घडल्या नाहीत.
1972 नंतर मात्र कामगार संघटना अधिक बळकट झाली. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्ययाच्या विरोधात संघटना उभी राहू लागली. त्या वेळी अण्णासाहेब मगर हे आमदार होते.
अनेक संस्थांचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब मगर होते. ते स्वतः अध्यक्षपदी असतानाही त्यांनी सातत्याने कामगारांच्या हिताचा विचार केला. इंटक ही संघटना 1954 साली सुरू झाली. परंतु 1971-72 च्या काळात ती अधिक तीव्र होऊ लागली. 1971 मध्ये अण्णासाहेब मगर इंटकचे अध्यक्ष होते. त्यांच्या या कार्यात त्यांना संघटनेचे जनरल सेक्रेटरी वसंत देवकर यांनी मदत केली. त्या वेळी कामगार युनियनला सबयुनियन तयार करण्यात आल्या होत्या. एकट्या ऍम्यनेशन फॅक्टरीत बारा युनियन होत्या. या बाराही युनियन इंटकशी संलग्न होत्या.
टेल्को, बजाज ऑटो, बजाज टेम्पो, सॅन्डविक आशिया, एस के. एफ., फोर्ज मार्शल, फिलिप्स, प्रीमिअर, गरवारे, के. एस. बी. पंप, ग्रीव्ज् फोसेको अशा नामांकित कंपन्या या भागात येण्यासाठी अण्णासाहेबांनी विशेष प्रयत्न केले. औद्योगिक परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित अशा कंपन्या येथे आल्या. त्यांच्या प्रयत्नामुळे शहरात लहानमोठे उद्योग स्थापन होण्यास मदत झाली. पिंपरी-चिंचवडच्या विकासात एम.आय.डी.सी.चा मोठा वाटा आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला एम.आय.डी.सी.कडूनच पाणीपुरवठा होत होता. शहरातील एम.आय.डी.सी.मुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी एम.आय.डी.सी.ने घेतल्या त्या स्थानिक शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून चाळी बांधण्यासाठी अण्णासाहेब मगर यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची राहण्याची समस्या दूर झाली. शेतकऱ्यांची भाडे व्यवसाय सुरू झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली. 1960 साली गाडगीळ समितीने औद्योगिकीकरण व नागरी समस्या यांचा अभ्यास करून प्रादेशिक नियोजनाचा विचार मांडला. त्यातनूच नवनिर्मित शहराची संकल्पना पुढे आली.
नगरपालिकेची स्थापना
लोकसंख्येत वाढ झाल्याने समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायती कमी पडू लागल्या. त्यामुळे हवेलीचे तत्कालीन आमदार अण्णासाहेब मगर यांनी महाराष्ट्र सरकारकडे हे सर्व मुद्दे मांडले. या भागाच्या विकासासाठी नगरपालिका व्हावी, अशी अण्णासाहेब मगर यांनी शासनाकडे मागणी केली. त्यानुसार प्रथम पिंपरी ग्रामपंचायतीचा नगरपालिका निर्मितीसाठीचा ठराव करून शासनाला पाठवला. 1969 साली महाराष्ट्राचे तत्कालीन नगरविकासमंत्री पु. ग. खेर यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक घेतली. त्यांनी स्थानिकांना ग्रामपंचायतीच्या मर्यादा आणि नगरपालिकेचे महत्त्वाचे स्पष्ट केले. पुढे अण्णासाहेबांनी या कामात सातत्य ठेवून प्रयत्न केल्याने 4 मार्च 1970 रोजी पिंपरी-चिंचवड नवनगरपालिका अस्तित्वात आली. शहरात कारखानदारी वाढवण्यासाठी सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाण यांनी अण्णासाहेबांवर सोपवली. अण्णासाहेबांनी ती यशस्वीपणे पेलली. पुढे तेथील गावपण जाऊन नगरपालिका आली. हे सर्व अण्णासाहेबांमुळेच झाले. ग्रामपंचायतींचे विसर्जन करून पिंपरी-चिंचवड नवनगरपालिका अस्तित्वात आली. त्यानंतर नवनगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी शासनाने 12 सदस्यांची नियुक्ती केली होती. त्यात अण्णासाहेब मगर पहिले नगराध्यक्ष झाले.
1960 च्या दशकात नगरपालिका हद्दीत अनेक उद्योगधंदे आले. त्यामुळे कामगारांची संख्या वाढली. लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यांच्या मूलभूत सुविधा पुरवणे शक्य होत नव्हते. त्यांच्या निवासाचा सर्वांत मोठा प्रश्न सोडविण्यासाठी अण्णासाहेबांनी सॅटेलाइट टाउनची (उपनगरीय शहराची) शिफारस शासनाकडे केली. पुणे महानगर प्रादेशिक नियोजन मंडळाने पिंपरी-चिंचवड भागात स्वयंपूर्ण नवनगर स्थापन करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर अण्णासाहेबांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन 14 मार्च 1972 रोजी पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाची स्थापना केली. त्यातून विविध उत्पन्न गटांसाठी गृहबांधणी प्रकल्प राबवले. पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या भोवती नवनगर वसवण्याचे शासनाच्या नियमानुसार ठरवण्यात आले. त्यानुसार शासनाने भोसरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, रावेत, माशी, चिखली, थेरगाव, रहाटणी व वाकड या दहा गावांमध्ये 4,324 हेक्टर एवढे क्षेत्र प्राधिकरणासाठी अधिसूचित केले. शहरात उद्योगधंद्यासाठी व कामासाठी आलेल्या नागरिकांच्या राहण्याची सर्वांत मोठी सोय केली.
त्यांना मूलभूत सोयीसुविधा देण्यात आल्या. या सर्व कार्यात अण्णासाहेब मगरांचा सिंहाचा वाटा आहे. अण्णासाहेबांनी स्थानिक शेतकरी, कामगार, उद्योजक यांची मोट बांधण्याचे सर्वांत महत्त्वपूर्ण काम केले. जगात पिंपरी-चिंचवड महापाहिलकेचा जो नावलौकीक आहे त्यात अण्णांची दूरदृष्टी आणि नियोजन खूप महत्त्वाचे ठरले आहे.