Ankita Walawalkar: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला यूट्यूबर अनुराग डोभाल सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याची चर्चा सुरू आहे. ‘यूके०७ रायडर’ म्हणून ओळखला जाणारा अनुराग डोभालने अलीकडेच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने कुटुंबाकडून होत असलेल्या छळाबद्दल गंभीर आरोप केले आणि स्वतःच्या मानसिक स्थितीबद्दलही बोलला. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनुराग डोभालने जवळपास दोन तासांचा व्हिडिओ शेअर करत आपल्या आई-वडिलांवर, भावावर आणि काही नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या मते, आंतरजातीय लग्नामुळे कुटुंबीयांनी त्याला स्वीकारले नाही. यामुळे त्याला सतत त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे ज्या पत्नीसाठी तो सर्वांच्या विरोधात उभा राहिला, ती पत्नीही इतरांच्या प्रभावामुळे त्याला सोडून गेल्याचा दावा त्याने या व्हिडिओमध्ये केला आहे. व्हिडिओमध्ये बोलताना अनुरागने सांगितले की, तो सध्या खूप मानसिक तणावात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नीट अन्नही घेत नसल्याचे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा इशाराही दिल्यामुळे त्याचे चाहते आणि सोशल मीडिया वापरणारे अनेकजण चिंतेत पडले आहेत. अनेकांनी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत त्याने शांत राहावे आणि असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, अशी विनंती केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये सोशल मीडियावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने एक भावनिक आणि विचार करायला लावणारी पोस्ट शेअर केली आहे. अनुराग डोभालच्या व्हिडिओच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावरील खोट्या आनंदाच्या प्रतिमेबद्दल स्पष्टपणे बोलले. अंकिता वालावलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, सोशल मीडियावर दिसणारे आयुष्य नेहमीच पूर्ण सत्य नसते. अनेक इन्फ्लुएन्सर्स त्यांच्या आयुष्यातील फक्त सुंदर आणि आनंदी क्षणच लोकांसमोर मांडतात. फोटो, प्रवास, सेलिब्रेशन किंवा यशाचे क्षण हे सर्व लोकांना दिसतात. पण त्यामागे असलेले दुःख, ताण, संघर्ष आणि वैयक्तिक समस्या सहसा कोणालाही दिसत नाहीत. Ankita Walawalkar तिने पुढे सांगितले की, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. कधी आर्थिक ताण असतो, कधी वैयक्तिक आयुष्यातील समस्या असतात, तर कधी मानसिक थकवा जाणवतो. मात्र हे सगळे प्रसंग लोक कॅमेऱ्यावर दाखवत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणारे आयुष्य नेहमीच परिपूर्ण असते असे मानणे चुकीचे आहे. अंकिताने लोकांना सल्ला देताना म्हटले की, इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणे चुकीचे नाही. त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, पण आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करू नये. स्वतःची विचारशक्ती जपणे आणि स्वतःच्या आयुष्याला महत्त्व देणे अधिक आवश्यक आहे. तिने शेवटी असेही सांगितले की, इतरांच्या आयुष्याकडे सतत पाहत बसण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य घडवण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकासाठी त्याचे स्वतःचे वास्तवच सर्वात महत्त्वाचे असते. अंकिता वालावलकरची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्या मताशी सहमती दर्शवत सोशल मीडियावरील वास्तव आणि आभासी जगातील फरक स्पष्टपणे मांडल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.