नवी दिल्ली – लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपला पराभव होणार असल्याची खात्री पटल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना फोडून सत्तेत सहभागी करून घेण्यात आले, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केला. भाजपच्या या राजकारणाला महाराष्ट्राची जनता कंटाळली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला. मागील दीड वर्षांपासून राज्यात आमदारांना पळवून नेण्याचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनिवले. एवढे सगळे करूनही भाजपला चैन पडले नाही. म्हणून भाजपने आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार फोडले आणि त्यातील नऊ जणांना मंत्री बनविले.
देशमुख म्हणाले, राज्यात शेतकरी आणि तरूणांच्या अनेक समस्या आहेत. महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. कापसाला भाव नाही. उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही आहे. अशात पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. शेतकरी नाराज आहे. तरूणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे. महागाई वाढली आहे. परंतु, या समस्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही.
महाराष्ट्रात ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. याबाबत सरकार उदासीन आहे. ग्रामीण भागातील तरूण जे शहरात अभ्यास करायला येतात. त्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात दोन वस्तीगृह बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ही घोषणा अजूनही कागदावरच आहे.
आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या आरोपाबाबत देशमुख म्हणाले की, मला एका खोट्या आरोपात फसविण्यात आले होते. न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या नावाने सहावेळा समन्स जारी केले. परंतु, ते एकदाही हजर झाले नाही.
यानंतर जेव्हा अटक वॉरंट जारी केला तेव्हा त्यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले शंभर कोटी रुपयाचे आरोप ऐकिव माहितीच्या आधारावर केलेले असून त्याचा आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, असे परमबीर सिंह यांनी त्यात म्हटले आहे. यामुळे न्यायालयाने माझी सुटका केली, असे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.