नगर – भीमाशंकर साखर कारखान्यातून आपल्या मुळ गावी जाणाऱ्या ऊस तोडणी कामगारांवर अडकून पडण्याची वेळ आली होती. मात्र, काही पत्रकारांच्या आणि हरजीत सिंह वाधवा यांनी मदतीचा हात पुढे केल्याने हे ऊस तोडणी कामगार पुढे मार्गस्त होऊ शकले.
त्याचे असे झाले की, भिंगार शहराची लॉकडाउन मध्ये काय स्थिती आहे. याची पाहणी करण्या करता काही पत्रकार गेले असता किल्ला मैदान परिसरात 8 बैलगड्यांमधून आलेले ऊस तोडणी कामगार आपल्या कुटुंबकबिल्यासह थांबलेले दिसल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा ते कळंब तालुक्यातून नगर कडे आल्याचे समजले. या कुटुंब कबिल्यातील महिलांनी लाकडं गोळा करत चुली मांडल्या होत्या. त्यांचेकडे शिल्लक असलेले धान्य त्यांनी शिजवायला घेतलं होतं.
इतक्यात ह्या तांड्यातील 20 जणांच्या जेवणाची सोया करावी असं एका पत्रकाराच्या मनात आलं त्याने लगेच हॉटेल सुवर्णम प्राईडला फोन केला, तिकडून तात्काळ उत्तर मिळालं की आम्ही शिजवलेलं सगळं अन्न वाटपासाठी हरजीत सिंह वाधवा संचलित फाउंडेशन कडे देतो. हरजित सिंह वाधवांना संपर्क केला असता अर्ध्या तासात जेवण पोहोच होईल असे सांगण्यात आले.विचारपूस चालू असतानाच लक्षात आलं की ह्या तांड्यातील एका बैलाचा पाय दुखावला असून त्याच्या पायातून रक्त गळत होते. त्याला नाल ठोकणे अत्यंत गरजेचे होते. मग नाल ठोकणाऱ्याची शोधा शोध सुरु झाली.
मग केडगाव मधील एका लोहाराचा पत्ता मिळाला पण लॉकडाउन च्या परिस्थितीत तो येणार कसा इतक्यात हरजीत सिंह वाधवा या 20 लोकांचे जेवण घेऊन तेथे आले. तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर बैलाला नाल ठोकणे किती महत्वाचे आहे हे वाधवांच्याही लक्षात आले. त्यांनी तात्काळ केडगाव जवळील अर्चना हॉटेल येथे असलेल्या लोहाराला स्वतः गाडीतून आणण्याची तयारी दाखवली. आणि काही वेळात घेऊनही आले वाधवांच्या या सहकार्यामुळे या ऊस तोडणी कामगारांचा अडखळणारा प्रवास पुन्हा सुरु झाला.
लॉकडाउन च्या काळात अनेकांना अत्यंत बिकट परिस्थितून जावे लागत आहे. तर अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. मात्र याच काळात अनेक सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे आल्याने काहींची घडणारी उपासमार थांबली आहे. यात खान्देश युवा मंच आणि हेलपिंग हॅन्ड्स फाऊंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने 50 कुटुंबांना 1 महिना पुरेल इतका शिधा दिला आहे.