मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर कंगना मुंबईत येण्यापूर्वीच पाली हिल परिसरात असलेल्या तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने ऑफिसचे टाळे तोडून कार्यलयाची तोडफोड केली होती. यानंतर कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करत शिवसेनेवर सडकून टीका केली. तेव्हापासून बीएमसी, शिवसेना आणि कंगना यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
यातच आता पुन्हा एकदा कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे. तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या बांधकाम कामावरून योजनेचे गंभीर उल्लंघन केल्या प्रकरणी मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे.
तत्पूर्वी, बीएमसीच्या पथकाने अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून कंगना राणावत हिच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्या विरोधात कंगना रनौत हिने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. तोडफोडी चुकीची असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) फटकारले होते.