खडकवासला -खडकवासला धरण साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात स्थिरावलेल्या मान्सूनने दोन दिवसांपासून उघडीप दिली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.
वेळेत मान्सून दाखल झाल्याने शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण असून शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. धरण साखळीतील चारही धरणात 1.33 टीएमसीने वाढ झाली आहे.
दोन दिवस आगोदर दाखल झालेला मान्सून खडकवासला धरण साखळीतील पाणलोट क्षेत्रात विसावला. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. भीज पावसामुळे शेतशिवाराची पाणी पातळी वाढली आहे.
शेतकऱ्यांची शेतीकामाची लगबग सुरू आहे. भात लावणीच्या रोपांसाठी वाफे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे वाफे पंधरा दिवसांचे झाले आहेत.
त्यांची चांगली उगवण झाली आहे. दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने वाफसा मिळताच शेतशिवाराची फणणी, निंदणीची कामे उकण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहे.
यावर्षीचा मान्सून दाखल झाल्यानंतर एक जूनपासून खडकवासला पानशेत वरसगाव व टेमघर धरणाचे पाणी पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे.
त्यामुळे धरण साखळीतील चारही धरणांमध्ये 1.33 टीएमसी इतकी वाढ झाली आहे. चारही धरणात एकूण पाणीसाठा 27.27 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी यादिवशी 5.83 टीएमसी म्हणजे 19.99 टक्के पाणीसाठा होता.