Hingoli : डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण! संत नामदेव महाराज पालखीचा पहिला अश्व रिंगण सोहळा रामलीला मैदानावर संपन्न

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण मंगळवारी १७ जून रोजी सायंकाळी हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पार पडले. अश्व रिंगणाचा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी शेकडो भाविकांची उपस्थिती होती.
यावेळी हरिनामाचा गजर करण्यात आला. नर्सी येथील संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा सकाळी नर्सी नामदेव येथून हिंगोलीकडे निघाला. घोटा, सवड, केसापूर मार्गे पालखी सोहळा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हिंगोली येथे पोहोचला. हिंगोली येथील महाराजा अग्रसेन चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी पालखीचे पुजन केले.
यावेळी आमदार संतोष बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सदस्य मनोज आखरे, द्वारकादास सारडा, ॲड. मनिष साकळे, अशोक नाईक, माजी नगरसेविका अनिता सुर्यतळ, चंदू लव्हाळे, बाळू बांगर यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
भाविकांनी लुटला फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद
दरम्यान, टाळ मृदंगाच्या गजरात तसेच हरिनामाचा जयघोष करीत पालखी सोहळा रामलीला मैदानावर पोहोचला. या ठिकाणी पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण पार पडले. माजी नगरसेवक अशोक नाईक यांच्या पुढाकारातून परिसरातून अश्व बोलावण्यात आले होते. अश्व रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. रामलीला मैदानावर हरिनामाचा गजर करीत भाविकांनी फुगडी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर सुमारे 12 अश्वांच्या माध्यमातून रिंगण सोहळा पार पाडला.
टाळ मृदंगाचा गजर व मुखी हरिनाम
डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा भाविकांनी डोळ्यात साठवून ठेवला. या पालखी सोहळ्याचा हिंगोलीत मुक्काम झाल्यानंतर पालखी बुधवारी १८ जून रोजी औंढा नागनाथकडे रवाना होणार आहे. दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी राजवैभवी थाटात नांदेड नाक्यावर स्वागत घोडेस्वारही स्वागतासाठी सहभागी रामलीला मैदानावर पहिला रिंगण सोहळा नांदेड नाक्यावरून पालखी ढोलताशा टाळ मृदंगाचा गजर व मुखी हरिनाम घेत पालखी इंदिरा गांधी चौकातून जुनीनगर परिषद इमारती जवळून पालखी रामलिला मैदानावर गेली.
येथे पालखीचे पहिले गोल रिंगण झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले. रात्री हिंगोली शहरातील कल्याण मंडपात पालखीचा मुक्काम होता. येथे कागलीवाल परिवाराच्या वतीने पालखीतील वारकऱ्याच्या भोजनाची व्यवस्था केली. बुधवारी १८ जून रोजी पालखी औंढा येथे मुक्कामी थांबणार आहे.
त्यानंतर बाराशीव, हट्टा, परभणी, पोखर्णी, गंगाखेड, उकडगाव,परळी वैजनाथ, अंबाजोगाई, बोरी सावरगाव, वडगाव रामा, मसा, दगड धानोरा, खांडवी, चिंचगाव टेकडी, लहुळ, आष्टीमार्गे पंढरपूरकडे रवाना होईल. दरम्यान पालखीचे दुसरे रिंगण परळी वैजनाथ, तिसरे अंबाजोगाई व चौथे रिंगण जऊळबन येथे होणार असल्याचे नामदेव संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी सांगितले.





