Anna Hazare : “कोणत्याही प्रश्नाचे उत्तर…”; सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारेंचा केंद्र सरकाराला मोठा इशारा
Anna Hazare : अशा परिस्थितीत त्यांच्या संयमाची आणखी परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

Anna Hazare : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. पण दिल्ली पोलिसांनी ही कारवाई न्यायालय आणि वैद्यकीय कारणास्तव केल्याचा दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारला संवादाचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. सोनम वांगचुक यांनी सलग २० दिवस उपोषण करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या संयमाची आणखी परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले अण्णा हजारे?
“कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ संवादातूनच मिळू शकते. सरकारने स्वतःची भूमिका मांडावी आणि समोरच्या बाजूचेदेखील म्हणणे ऐकून घ्यावे. त्यानंतरच तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. २० दिवस उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही.” असा इशारा अण्णा हजारेंनी केंद्र सरकारला दिला आहे.
वांगचुक यांच्या शरीरात पाण्याची कमतरता
सोनम वांगचुक आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाला २० दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रकृती खालावू लागल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या शरीरात अशक्तपणा जाणवत असून, निर्जलीकरणाची (पाण्याची कमतरता) लक्षणेही आढळली आहेत.
वांगचुक यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांच्या विशेष पथकाचे लक्ष
मात्र, रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा सोनम वांगचुक पूर्णपणे शुद्धीवर होते. त्यांचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. तसेच, आवश्यक वैद्यकीय उपचार स्वीकारावेत, यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत
या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही होती. आंदोलनकर्त्यांच्या मते, NEETसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याशिवाय, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)च्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी, पेपरफुटीच्या सर्व प्रकरणांची पारदर्शक तपासणी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.






