अरुण गोखले
कोणत्या आईला आपल्या मुलाला आपल्यापासून दूर पाठवायला आवडेल? पण काही वेळा मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या शिक्षणासाठी, तो शिकूनसवरून मोठा व्हावा, त्याने चांगले नाव कमवावे, त्याचे कल्याण व्हावे यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. रतनलासुद्धा मिलिटरी स्कूलमध्ये शिकायला पाठवताना त्याच्या आईला तसा कठोर निर्णय घ्यावा लागला होता. रतनला शिक्षणासाठी दूर पाठवताना त्याच्या आईलाही खूप वाईट वाटलं होतं. पण आज सकाळपासून रतनच्या आईला त्याची सारखी राहून राहून आठवण येत होती. रतनला जाऊन जवळपास पंधरा दिवस झाले होते.
पण ना त्याचे पत्र, ना फोन, आईला त्याची फार काळजी वाटत होती. तो कसा असेल, तिथल्या कडक शिस्तीला, एकटेपणाला, स्वावलंबी जीवनाला तो सरावला असेल का? त्याला ते स्वावलंबी जीवन जगताना काही त्रास तर होत नसेल ना? या विचारांमुळे आईला जराही चैन पडत नव्हती. तोच दारावरची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. दारात पोस्टमन उभा. त्याने एक पाकीट दिले आणि तो निघून गेला. आईने पत्र हातात घेतले, त्यावरचे अक्षर पाहिले आणि तिने ओळखले की पत्र आपल्या बाळ रतनचेच आहे. तिने ते पत्र लगबगीने फोडले आणि पत्र वाचू लागली.
प्रिय आईस, रतनचा नमस्कार,
आई, मी इथे खूप मजेत आहे. नव्या वातावरणाशी आता हळूहळू रुळू लागलो आहे. इथले वातावरण फार शिस्तीचे, कडक आणि स्वावलंबी आहे. सारी कामे इथे ज्याची त्यालाच करावी लागतात. शिस्त पाळावी लागते. पण खरं सांगू का आई, त्यावेळी तू मला जे शिस्तीचे, स्वावलंबनाचे, स्वत:चे काम स्वत: करण्याचे जे धडे दिलेस ते सारे आज इथे उपयोगी पडत आहेत. इथे रोज सकाळी आपले आपण लवकर उठावे लागते. अंथरुण-पांघरुणाच्या घड्या घालाव्या लागतात. स्वत:चे कपडे स्वत: धुणे, ताटवाटी घासणे, केर काढणे, खोली आवरणे, रोजचा रोज अभ्यास पुरा करणे अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी इथे ज्याच्या त्यालाच कराव्या लागतात.
आई, ज्या मुलांना या गोष्टीची सवय नाही त्यांना फार त्रास होतोय. हे पाहिल्यावर त्यावेळी तुझ्या कडक शिस्तीने, थोड्याशा धाकाने आणि प्रेमळ सल्ल्याने मी त्या सर्व गोष्टी शिकलो, त्यावेळी त्याचे वाईट वाटत होते. कधी कधी तर मला तुझ्या त्या गोष्टी शिकवण्याचा, हट्टाने त्या करून घेण्याचा, तुझा थोडासा राग येत होता. पण आज मला त्याचं मोल कळले आहे. आई, या माझ्या आनंदाचं, सुखाचं, सारं श्रेय हे केवळ तुलाच आहे. तुझा लाडका रतनचं ते पत्र वाचलं आणि आईचं डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.