Amravati Accident : अमरावतीत भीषण अपघात (Amravati Accident) झाला आहे. एसटी बस आणि ऑटोच्या धडकेत शाळकरी मुलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलवले आहे. सदर घटना जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार रोडवर घडली आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस या दुर्घटनेचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेतील मुले हे वरुडला रिक्षाने जात होते. या रिक्षामध्ये काही स्थानिक नागरिक देखील होते. दरम्यान वरुड-राजुरा बाजार रोडवर प्रवाशांनी भरलेली एसटी बस आणि रिक्षा यांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये शाळकरी मुलांचा देखील समावेश आहे. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलवले आहे. दरम्यान, एसटीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर एसटी चालकाला वरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.