Amol Mitkari : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघातातील दुर्दैवी निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून सातत्याने शंका आणि आक्षेप व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार खासगीत ‘दादांच्या’ मृत्यूबाबत संशय व्यक्त करत असताना, आता पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीरपणे पुढे येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार यांच्या अपघाताबाबत अनेक गोष्टी सामान्य वाटत नाहीत. त्यांनी प्रथमच जाहीरपणे समाज माध्यमांवरही या शंकांचा उल्लेख करून चौकशी यंत्रणांना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी अपघाताची वेळ, विमान निवड, वैमानिक बदल, अपघातावेळी ऐकू आलेले आवाज, धुके नसणे, घड्याळाचा गोंधळ आणि कागदपत्रे जळाले नसणे यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. Amol Mitkari त्यांच्या मते, अजित पवार यांच्या नियमित प्रवासासाठी नेहमी वापरले जाणारे विमान का दिले गेले नाही, हे समजत नाही. वैमानिक सुमित कपूर यांना अचानक बोलावण्यात आले. कंपनीने सांगितले की, नियमित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे कपूर यांना पाचारण केले, पण इतक्या अखेरच्या क्षणी असा बदल का झाला, याबाबत शंका आहे. अपघातावेळी विमानातून दोनदा मोठे आवाज ऐकू आले, जे स्थानिक सरपंचांच्या म्हणण्यानुसार या विमानतळावर यापूर्वी कधीच ऐकू आले नव्हते. या सगळ्या घटनांमुळे शंका घेण्यास वाव आहे, असे मिटकरी म्हणाले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली आणि सर्व प्रवासी जागेवरच मृत पावले, पण विमानातील कागदपत्रे आणि दस्तऐवज जळाले नाहीत. माळरानावर कागद सगळीकडे पसरलेले होते. अजित पवार यांच्या ओळखीचे प्रमुख चिन्ह असलेले घड्याळ अपघातानंतर त्यांच्या हातावर नव्हते. स्थानिक लोक सांगत होते की, घड्याळाचा आधार घेऊन मृतदेह ओळखावा लागेल, पण शवविच्छेदनासाठी नेल्यानंतरही ते घड्याळ सापडले नाही. घड्याळ कुठे गेले, याबाबत कुणीही स्पष्ट उत्तर देत नाही, असे मिटकरी यांनी सांगितले. अपघाताचे कारण सांगताना धुके असल्याने लँडिंग अडचणीचे सांगितले गेले, पण बारामतीत त्या वेळी लख्ख सूर्यप्रकाश होता, असे स्थानिक लोक सांगतात. मी स्वतः अपघातस्थळाची पाहणी केली असता मलाही काही शंका घेण्यासारख्या बाबी आढळल्या, असे मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले की, ते या प्रकरणाचे राजकारण करत नाहीत, पण या सगळ्या घटनांमुळे मनात प्रश्नांचा आगडोंब उसळतोय आणि हे प्रश्न प्रत्येकाला पडत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र चौकशी व्हावी, जेणेकरून सर्व शंकांचा निरास होईल आणि सत्य समोर येईल, अशी त्यांची मागणी आहे.