नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे शक्तीशाली नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात भोपाळ दौरा केला होता. तेव्हापासून मध्य प्रदेशातील राजकीय हवा तापली असून नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. राज्यात लवकरच मोठे फेरबदल होतील असे संकेत त्यातून मिळत आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळीही योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कथित नाराजी वाढली असल्याच्या बातम्या आल्यानंतर अगोदर शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचा दौरा केला होता. यात योगींची प्रशंसा करण्यापासून ते त्यांच्यासोबतची छायाचित्रे जारी करण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार पूर्ण केले गेले.
आम्ही योगींसोबत आहोत असा स्पष्ट संदेश कथित गटबाजी करणाऱ्यांना देण्यात आला होता व आम्ही एकजुटीनेच ही निवडणूक लढणार हे विरोधी पक्षांनाही संकेत देण्यात आले होते. योगींचे स्थान भक्कम झाले. करोना काळात गंगेत वाहुन आलेली प्रेते आणि काही भाजप नेत्यांचे बलात्काराचे प्रताप व अन्य नाराजी बाजूला पडून भाजप पुन्हा सत्तेत आली. आताही मध्य प्रदेशातही भाजपने तशीच हालचाल सुरू केली आहे.
भाजपचे राज्यातील नेते याचा इन्कार करत असले तरी कॉंग्रेसने मात्र दिल्लीत काळे ढग जमा झाले आहेत, लवकरच पाऊस पडणार अशा आशयाची टिप्पणी दिली आहे. त्यामुळे राज्यात फेरबदलाचे संकेत प्राप्त झाले आहेत. शहांच्या भोपाळ दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिल्ली गाठली. त्यांची प्रकृती बरी नसल्याच्या चर्चा आहेत.
त्या खऱ्या की कंड्या पिकवल्या जात आहेत ते उद्या म्हणजे गुरूवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल कारण उद्याच मध्य प्रदेशच्या संदर्भात दिल्लीत बैठक होणार आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हेही आजच दिल्लीत दाखल झाले आहेत. गेल्या काही काळात चौहान यांच्यापेक्षा मिश्राच माध्यमांमध्ये अधिक झळकत असल्यामुळे थेट त्यांना बढती की चौहान यांना पाठबळ की मंत्रिमंडळाचा विस्तार अथवा फेरबदल भाजपच्या अजेंड्यावर आहे ते लवकरच स्पष्ट होणार आहे.