नीरा – अवघ्या दोन दिवसाच्या अर्भकाला जमिनीत जिवंत गाडण्याचा प्रकार पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील जागरूक शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे उधळून लावला. मात्र, मुलाला वाचवण्याच्या गडबडीत त्याला पुरण्याचा प्रयत्न करणारे दोघे तरुण पळून गेले. पोलिसांनी याबाबतच गुन्हा दाखल केला असून ते या युवकांचा शोध घेत आहेत. हे अर्भक आता सुरक्षित आहे.
मनोज अशोक रणपिसे (रा. आंबोडी, ता. पुरंदर) यांनी याची फिर्याद दिली. आंबोडी हद्दीतील गायरान जमिनीजवळ वनखात्याच्या शेतात हृषिकेश विनायक रणपिसे (वय 17), यश विनायक रणपिसे (वय 14) आणि अविष्कार अशोक बोरकर (वय 18) हे तिघे शेतात काम करीत होते. त्यांना दुपारी दोनच्या सुमारास एक लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. या शेतात लहान बाळ कोठून आले? असा विचार करून त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी दोन युवक एका खड्ड्यात माती टाकत
होते.
शेतकरी येत असल्याची चाहूल लगताच तरुणांनी दुचाकीवरून पळ काढला. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु ते हाती लागले नाहीत. शेतकऱ्यांनी खड्ड्यात पहिले असता एक लहान बालक अर्धवट गाडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी बालकास खड्ड्यातून बाहेर काढले आणि याची माहिती पोलिसांना कळवली. ती समजताच सासवडचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हाके यांनी सांगितले की, या अर्भकाचे वय केवळ दोन दिवसांचे असावे. ते अर्भक पुरुष जातीचे आहे. त्याचा ताबा घेऊन त्याची जेजुरी ग्रामीण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अर्भकाची नाळही काढलेली नव्हती. अर्भक सुखरूप आहे. अनैतिक संबंधातून ते जन्मले असल्याची शक्यता आहे त्यामुळे त्यास जिवंत गाडण्याचा प्रकार घडला असावा. मात्र, सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे.
– डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक