लोणी धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोबाइल नेटवर्कचा फज्जा उडाला आहे. सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाले असून, व्हॉइस कॉल आणि इंटरनेट कोलमडून पडल्याच्या अवस्थेत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने सेवा देणाऱ्या आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, जिओ, बीएसएनएल आदी सर्वच कंपन्यांचे 8 ते 10 टॉवर असूनही नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. यातील अनेक कंपन्यांचा सर्वोत्तम नेटवर्क देत असल्याचा दावाही गेल्या चार दिवसांमध्ये फोल ठरला, असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कित्येकदा रेंजच गायब असते, रेंज असेल तर लाइन व्यस्त असतात त्यामुळे बराचकाळ कॉल लागत नाही.
मधूनच नेटवर्क गायब होते नाहीतर कॉलमध्ये कंजेक्शन ठरलेलेच. दरम्यान, या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, बॅंक, ग्रामपंचायत, रेशन दुकान, खते, औषधे दुकानदार असून जवळपास सगळ्यांकडेच ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात; मात्र कित्येक दिवसांपासून नेटवर्कची समस्या येत असल्याने ऑनलाइन व्यवहारात प्रचंड अडचणी येत असल्याने नागरिकांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
संतप्त नागरिक काढणार मोर्चा
धामणी परिसरात आठवड्यातून दोन-तीन दिवस तासंतास नेटवर्कच नसते. मोबाइल कंपन्याच्या गैरकारभारामुळे मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. जेणे करून या कंपन्यांना जाग येईल अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, राष्ट्रवादी आंबेगाव तालुक्याचे सरचिटणीस रामदास जाधव, सरपंच सागर जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन जाधव, उपसरपंच पूनम जाधव, युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षयराजे विधाटे यांनी दिली.
नेटवर्क नाही त्यात सेवांचे दर वाढवले
मागील काही दिवसांपासून जवळजवळ सर्वच कंपन्यांच्या मोबाइल नेटवर्कबाबत समस्या निर्माण होत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसतो आहे. एकीकडे मोबाइल सेवांचे दर वाढत असताना त्या प्रमाणात सेवा मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. मोबाइल सेवा देणाऱ्या सर्वच कंपन्यांनी त्यांचे दर कमी अधिक प्रमाणात वाढविले असून मोबाइलची सेवा सुधारण्याची अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत असताना सध्या निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.