प्रभात वृत्तसेवा रांजणी – आंबेगाव तालुक्यात भूसंपादनाच्या प्रक्रियेसंदर्भात अनेक अडी -अडचणी आहेत. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवून त्यांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती रस्ते परिवहन व राजमार्ग केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी नवी दिल्ली येथे दिली असल्याची माहिती भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांनी दिली. भाजपा पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन व राजमार्ग राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची भेट घेतली. त्यांना राज्यात सध्या नॅशनल हायवेबाबत चाललेल्या कामासंदर्भातील माहिती दिली. या भेटीमध्ये राजकीय, सामाजिक आणि चालू असलेल्या राजकीय घडामोडीबाबत बाणखेले यांनी हर्ष मल्होत्रा यांच्याशी संवाद साधला. गेल्या काही वर्षात आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले असून त्या भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दिला गेला नाही. यासंदर्भात प्रमोद बाणखेले यांनी राजमार्ग केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांना माहिती दिली. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळत नसल्याचे बाणखेले यांनी मंत्री मल्होत्रा यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यावर मंत्री मल्होत्रा यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे बाणखेले यांनी सांगितले.