Ambegaon News – माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आंबेगाव तालुका पंचायत समितीचा निवडणूक निकाल सोमवारी (दि. 9) जाहीर झाला. पंचायत समितीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 जागा निवडून आल्या आहेत. गेल्या वेळेस सत्ताधारी पक्षाच्या 6 तर विरोधकांच्या 3 आणि 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. यावेळेस माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारात फिरू शकले नाही. तरी कार्यकर्त्यांनी जबाबदारी पेलून पंचायत समितीमध्ये विजय खेचून आणला आहे. त्या माध्यमातून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व आहे. शरदचंद्र पवार पक्षाला फक्त 2 जागांवर यश मिळाले आहे. पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण असल्यामुळे या पदासाठी पुरुष किंवा महिला दोन्हीं उमेदवार दावा करू शकतात. आंबेगाव तालुका पंचायत समितीमध्ये सर्वाधिक मतांनी कळंब पंचायत समिती गणाच्या उषाताई रमेश कानडे या 3054 विक्रमी मतांनी निवडून आलेल्या आहेत. त्या खालोखाल निलेश टेमकर 2577 मतांनी, ज्योती पारधी ह्या 2147 मतांनी, माजी सभापती कैलास काळे 1853 मतांनी, संजय गवारी हे 1745 मतांनी, संजय पवळे हे 1595 मतांनी तर शिवाजी निघोट 456 मतांनी निवडून आले आहेत. सभापती पदासाठी तसे पाहता अनुभवी प्रमुख दावेदार उषाताई रमेश कानडे आणि संजय गवारी, कैलास काळे हे असल्याची चर्चा आहे. पंचायत समिती उमेदवारांमध्ये सभापती पद भूषविलेले कैलास काळे, उषाताई रमेश कानडे, संजय गवारी हे तीन अनुभवी सभापती पुन्हा एकदा आंबेगाव पंचायत समितीमध्ये निवडून आल्याने नेमकी कोणाला संधी मिळते किंवा नवीन चेहर्याला संधी मिळणार या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.