नवी दिल्ली – विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याबाबत दुर्लक्षित राहिलेल्या अंबाती रायुडु याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. निवृत्त होण्याच्या निर्णयाबाबत त्याने कोणतेही कारण दिलेले नाही असेही मंडळाने कळविले आहे.
भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी रायुडु हा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे कर्णधार विराट कोहली याने भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी विधान केले होते. मात्र, प्रत्यक्षात विजय शंकर याला स्थान मिळाले होते. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांनी शंकरच्या निवडीचे समर्थन केले होते. शंकर याच्याकडे खेळाच्या तीनही आघाड्यांवर चमक दाखविण्याची क्षमता असल्याचे विधानही त्यांनी केले होते. या विधानाची खिल्ली उडविताना रायुडु याने ट्विटरद्वारा असे म्हटले होते की, आता आपण घरात थ्रीडी भिंग घेत सामने पाहणार असल्याचे विधान केले होते. त्या विधानाची निवड समितीने गांभीर्याने दखल घेतली असावी. विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात राखीव खेळाडू त्याला स्थान मिळाले होते. जखमी झाल्यामुळे शंकर याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी मयांक अग्रवाल याला विश्वचषकाक्षी लॉटरी लागली.
निवड समितीने पुन्हा आपल्याला डावलल्यामुळे तो कमालीचा नाराज झाला व त्याने खेळातून निवृत्ती स्वीकारली. रायुडु याने एक दिवसाच्या 55 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये त्याने 47.05 धावांच्या सरासरीने 1,694 धावा केल्या आहेत. 2007 मध्ये झालेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये त्याने भाग घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने 2009 मध्ये त्याच्यावर कारवाई केली होती. मात्र, 2013 मध्ये झिम्बाब्वेविरूद्धच्या एक दिबसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला संधी मिळाली होती.आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज संघांकडून भाग घेतला होता. गतवर्षी सईद मुश्ताक अली लीगमध्ये बेशिस्त वर्तनाबद्दल त्याच्यावर दोन सामन्यांकरिता बंदी करण्यात आली होती.