छत्रपती संभाजीनगर – रामनवमीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा येथे दोन गटांत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. काल राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच एका अज्ञात तरुणांच्या गटाने जयंतीसाठी आलेल्या गटावर दग़डफेक सुरू केली. हा वाद वाढल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यात काही पोलीस जखमी देखील झाले. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या दंगलेप्रकरणी MIM आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी किराडपुरामध्ये जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले की, “दोनच दिवसांपूर्वीच मी महाविकास विकास आघाडीच्या बैठकीत शहरात दंगल होणार, असे सांगितले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.”
पुढे दानवे म्हणाले की, “नामांतराच्या मुद्यावर शहरात तणाव निर्माण केला जात आहे. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. MIM आणि भाजपला शहरात दंगल पाहिजे. त्यांचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळे मुस्लीम लोकांचे मन आपल्या बाजूने वळवण्यासाठी अशा पद्धतीचे काम केेले जात होत आहे.”
किराडपुरा परिसरात काही लोकांनी राडा घातल्याने सध्या हे प्रकरण चर्चेत आले आहे. मात्र सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तरी देखील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे.