शिरूर : शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १९९५ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३२ वर्षांनंतर ऐतिहासिक शिवनेरी गडावर अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालपणी एकाच वर्गात शिकलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तर त्या आठवणी घडविणाऱ्या गुरुजनांचा सत्कार हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. या वेळी त्या काळात विद्यार्थ्यांना घडविणारे चिमाजी बालचिंग गुरुजी यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. शिवनेरी गडावर जाऊन गुरुजींना विशेष भेटवस्तू देण्यात आली. हा प्रसंग पाहून गुरुजी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू अनावर झाले. सत्काराला उत्तर देताना गुरुजी म्हणाले, “आज आपण सर्वजण ३२ वर्षांनंतर भेटलो, याचा खूप आनंद झाला. तुमचं बालपण, शाळेतील प्रसंग एकेक करून आठवत आहेत. तुमची आजची प्रगती, आत्मविश्वास आणि निर्भीड जीवनशैली पाहून मला मनापासून समाधान वाटतं. तुम्ही केलेला हा सन्मान माझ्या आयुष्यातील अत्यंत मोलाची गोष्ट आहे.” ते पुढे म्हणाले की, “माझ्याकडून तुम्हा सर्वांचं आदरातिथ्य करण्याचं नियोजन होतं; मात्र एन.एम.एस. परीक्षेमुळे शिक्षक मित्र पर्यवेक्षक म्हणून गेले आणि नियोजन विस्कळीत झालं. भविष्यात पुन्हा योग आला तर ही उणीव भरून काढण्याचा नक्की प्रयत्न करीन.” गुरुजींनी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देताना म्हटले, “तुमच्या परिवारातील सर्वांना सुख, समृद्धी, निरोगी व दीर्घायुष्य लाभो. तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होवो, त्यांना यश, कीर्ती व मानसन्मान प्राप्त होवो, हीच सदिच्छा.” यानंतर सर्व माजी विद्यार्थी गुरुजींसोबत शिवनेरी – लेण्याद्री – ओझर या तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी गेले. सहलीसह हा स्नेहमेळावा आनंद, आठवणी आणि भावनांनी भरलेल्या वातावरणात संपन्न झाला. हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक भेट नव्हे, तर गुरु-शिष्य नात्याचा सन्मान, मैत्रीची पुनर्भेट आणि संस्कारांची उजळणी करणारा सोहळा ठरला, अशी भावना अनिल तांबे यांनी व्यक्त केली.