– अरुण गोखले
धर्म तुम्हाला अहिंसा शिकवतो. म्हणजे काय तर कोणाचीही हत्या, हिंसा न करणे हाच मानवाचा खरा धर्म आहे. जिवंत असलेल्या प्रत्येक जीवास जगायचे असते. मृत्यू कोणालाच नको असतो. त्यामुळेच जे लोक खरोखरच विवेकी, विचारी, संयमी असतात, ते अन्य कोणाचीच हिंसा करत नाहीत.
हिंसा न करणे म्हणजेच अहिंसा आणि अहिंसेचे पालन करणे हाच मानवाचा खरा धर्म आहे. जर तुम्हाला तोडलेले जोडता येत नसेल, तर जोडलेले तोडण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा तुम्ही स्वतःही आनंदाने जगा आणि इतरांनाही जगू द्या. हेच तर आपल्या सर्व धर्माच्या प्रचार आणि प्रसारकांनी मानवास समजावून सांगितले आहे. या ठिकाणी आणखी एका गोष्टीवर अहिंसेच्या पुरस्कर्त्यांनी विशेषत्वाने प्रकाश टाकला आहे.
ते म्हणतात की बाबांनो! तुम्हाला जर असे वाटत असेल की कोणा व्यक्तीवर, प्राण्यावर, निष्पाप निरपराधी जीवावर केलेला शस्त्राघात ही त्याची हत्या आहे किंवा हिंसा आहे तर ते तितके मर्यादित नाही. तर शस्त्राइतक्याच किंबहुना त्यापेक्षाही जास्त इजा करणार्या कटू कठोर शब्दांनी तुम्ही दुसर्याचे मन दुखावणे हीसुद्धा हिंसाच आहे. केवळ स्वत:च्या सुखासाठी इतरांची गळचेपी करणे, त्यांना पीडा देणे, लुबाडणेे, एखाद्याच्या असहाय्य परिस्थितीचा ङ्गायदा घेणे हीसुद्धा हिंसाच आहे.
हिंसेने आपण काय करीत असतो तर एक प्रकारे दुसर्याचा जगण्याचा, जिवंत राहण्याचा हक्क हिरावून घेत असतो. परपीडा न करणे, कोणाचे मन न दुखवणे, कोणास क्लेष यातना न देणे ही अहिंसा, हे लक्षात घ्यायला हवे. ‘जगा आणि जगू द्या’ हा बहुमोल जीवन संदेशसुद्धा त्यासाठीच आहे. सगळ्याशी मैत्रीच्या भावनेने वागणे, सर्वांचा आदर करणे, परस्परांत जगण्यात आणि जगविण्यात मदत करणे ही माणुसकी आहे.
ही अहिंसा आणि तिचं मोल हे ज्यांना खर्या अर्थाने समजले आहे अशा व्यक्ती कोणालाही कधीही पीडा करीत नाहीत. तर त्यांचे अंत:करण हे मानवतेच्या परस्परातील प्रेमभावाने हिंसा करणार्याला हे क्षमा करण्याइतके विशाल झालेले असते. क्षमा ही मनात खोलवर रुजलेल्या अहिंसेचे बाह्यदर्शन आहे. जर खर्या अर्थाने या जगातली हिंसा दूर झाली तर इथला प्रत्येक जीव निर्भय आणि सुखी होईल.