नगर -शहरातील व्यापाऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे. बाजारपेठेतील दुकानदारांवर संध्याकाळी पाचनंतर दंडात्मक कारवाई होत आहे. व्यापाऱ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात असून, आता बाजारपेठ सायंकाळी पाचऐवजी सातपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा व्यापारी आघाडीतर्फे यावेळी निषेध करण्यात आला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, भाजप व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, ऍड. विवेक नाईक, अनिल गट्टाणी, प्रशांत बोकडीया आदी यावेळी उपस्थित होते.
करोना बचावासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत व्यापार पूर्णपणे ठप्प होते. जनजीवन आता सुरळीत होत असताना शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत कार्यवाहीची मोहीम राबवली जात आहे. परंतु पोलिस आणि महापालिकेचे पदाधिकारी व्यापाऱ्यांच्या दुकानात गेल्यानंतर उध्दट भाषा वापरतात. व्यापारी हे गुन्हेगार असल्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जाते, असा आरोप शहर-जिल्हाध्यक्ष गंधे यांनी केला आहे.
भाजपच्या नेत्यांमध्येच एकमताचा अभाव..!
नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कालच दहा हजारांचा टप्पा ओलांडला. नगरमध्ये लॉकडाऊन करण्याची नितांत गरज असल्याची भूमिका भाजप नेते, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील महिन्यातच केली होती. त्या मागणीवर विखे पाटील आजही ठाम आहेत.
लॉकडाऊन न केल्यास नगरमध्ये तांडव पहावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्याच्याच पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे दुकाने सुरु ठेवण्याची वेळ सायंकाळी सातपर्यंत वाढवून मागत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांमध्येच या मुद्यावर एकमत नसल्याने स्पष्टपणे दिसते.