पुसेगाव – किल्ले वर्धनगड, ता. खटाव येथील सरपंचांनी राजकीय द्वेषातून माझे अतिक्रमण काढले आहे. मी या जागेची कायदेशीर फी भरण्यास तयार असतानाही संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचे राजकारण सरपंचाकडून केले जात असल्याचा आरोप शिवसेना रंगकामगार आघाडीचे नेते संजय घोरपडे यांनी केला आहे.
घोरपडे म्हणाले, गावातील अतिक्रमण काढण्यास माझा विरोध नाही. फक्त माझेच अतिक्रमण काढून बाकीच्यांचे तसेच ठेवायचे, हा दुजाभाव का? मी सिमेंटचे खांव उभे करून जनावरांसाठी कच्चा गोठा तयार केला होता; पण गावात अनेकांनी अतिक्रमणे करत पक्की बांधकामे केली आहेत. त्या सर्वांवर कारवाई झालेली नाही. सरपंचांनी आपले घर बांधतानाही अतिक्रमण केले असून गावठाणातील जमिनीवर अनेकांची घरे उभी आहेत. ती अजून नियमित झाली नाहीत तरी त्यांच्यासाठी वेगळा न्याय का? एक ग्रामपंचायत सदस्य गावठाणातील शेतजमीन कित्येक वर्षे वहिवटत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.