मुंबई – येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधकांच्या आघाडीने पूर्वाश्रमीचे भाजप नेते यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता.
याकामी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांचे राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होण्यापूर्वी एक नाव या चर्चेच्या केंद्रस्थानी होत ते म्हणजे शरद पवार. खुद्द ममता बॅनर्जी यांनी देखील पवार यांना उमेदवारी स्वीकारण्याबाबत आग्रह केला होता. मात्र पवार यांनी निवडणूक लढवण्यापासून स्वतःला दूरच ठेवलं.
अशातच आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना शरद पवार यांनी उमेदवारी का स्वीकारली नाही याबाबत खुलासा केला आहे. याबाबत बोलताना पवार यांनी, ‘भाजपा सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांनी मला राष्ट्रपतीपदासाठी आग्रह केला होता. पण माझे व्यक्तिगत मत स्पष्ट होते की ही जबाबदारी किंवा हे काम स्वीकारू नये. यात यश येण्याची स्थिती नव्हती.’ असे सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “यदाकदाचित यश आले असते तर माझ्यासारख्या माणसाला अखंड एका ठिकाणी बसणे, कुठेही बाहेर न जाणे, लोकांशी सुसंवाद न ठेवणे या सगळ्या गोष्टी त्रासदायक झाल्या असत्या. त्यासाठी हा आपला रस्ता नाही हा विचार असल्याने मी नाही म्हणून सांगितले.” असेही स्पष्ट केले.
शिवसेना खासदार मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या समर्थनात
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षाने आपला पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना द्यावा अशी मागणी शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केल्याचे समजते. खासदारांच्या या मागणीवर संजय राऊत नाराज असून ते विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याच्या समर्थनात असल्याचे सुत्रांकरवी कळते. उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात यावरून सेनेत आणखी डॅमेज होणार की डॅमेज कंट्रोल होणार हे ठरणार आहे.