अखिल भारतीय हाॅकी स्पर्धा : ध्यानचंद अकादमी आणि आर्मी बॉईजमध्ये अंतिम लढत…

पुणे – ध्यानचंद अकादमी आणि आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनी संघांदरम्यान या वर्षीच्या अखिल भारतीय स्तरावरील 16 वर्षांखालील एसनबीपी करंडक स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.
एसई सोसायटीच्या वतीने एसएनबीपी संस्था समूहाने हॉकी इंडिया आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मैदानावर शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर्मी बॉईज संघाने पदार्पण कऱणाऱ्या राऊंड ग्लास अकादमी संघावर 4-3 असा विजय मिळविला.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अमनदीप सिंगने राऊंड ग्लास अकादमी संघाला आघाडी मिळवून दिली. या एकमात्र गोलच्या जोरावर राऊंड ग्लासने मध्यंतराला आघाडी मिळवली.
उत्तरार्धात आर्मी बॉईजच्या खेळाडूंनी कमालीचा वेगवान खेळ करताना सलग चार गोल करत आपले वर्चस्व राखले. भावुकने दोन, तर हरपला आणि संचित होरोने एक गोल केला. मात्र, अमनदीपने दोन मिनिटातच दोन गोल करून राऊंड ग्लास संघाची पिछाडी भरून काढली. मात्र, बरोबरी राखण्यात त्यांना अपयश आले.
त्यापूर्वी पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गेल्या वर्षी तिसरा क्रमांक मिळविलेल्या ध्यानचंद हॉकी अकादमी संघाने यजमान एसएनबीपी संघावर 5-2 असा विजय मिळविला. सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या सत्रापासून खेळाने वेग घेतला. मनजित चव्हाण, रितेश पाण्डे आणि जयहिंद यादव यांनी गोल करून मध्यंतराला ध्यानचंद संघाला 3-0 असे आघाडीवर नेले.
उत्तरार्धात एसएनबीपी संघाने चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना केवळ दोन गोल करता आला. सुमित बारवा आणि फ्लाविस टिर्की यांनी पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान कल्लु अली आणि मिथालेश यादव यांनी आणखी दोन गोल करून ध्यानंचद अकादमीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

