पुणे –शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले टेमघर धरण 100 टक्के भरले आहे. तर, पानशेत व वरसगाव ही धरणे आधीच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे.
त्यामुळे खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार 155 क्युसेक, तर मुठा नदीत 3 हजार 424 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, ही चारही धरणे 100 टक्के भरले असल्याने आता जमा होणारे अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे.
पावसाचे प्रमाण आणि जमा होणाऱ्या पाण्यानुसार धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणात पाणी जमा होऊ लागले आहे. सर्वात आधी खडकवासला धरण 100 टक्के भरले. त्यानंतर पानशेत, वरसगाव आणि रविवारी टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. टेमघर धरणात 3.69 टीएमसी म्हणजे 99.55 टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात 12.82 टीएमसी म्हणजे 100 टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून नदीमध्ये 4 हजार 442 क्युसेकने, तर पॉवरहाऊसमधून वीजनिर्मितीसाठी 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
वरसगाव धरणातून एकूण 5 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर, पानशेत धरणातून पॉवरहाऊसमधून 600 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. पानशेत आणि वरसगाव धरणातून एकूण 5 हजार 600 क्युसेकने पाणी सोडले जात असून हे पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. खडकवासला धरणातून कालव्यात व नदीत मिळून एकूण 4 हजार 579 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला
खडकवासला प्रकल्पातील चार धरणे मिळून एकूण 29.13 टीएमसी म्हणजे 99.94 टक्के पाणीसाठा आहे. धरणे 100 टक्के भरल्याने यंदा शहरासाठी पिण्याचा पाण्याचा तर ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.