Alia Bhatt : ट्विंकल खन्ना आणि काजोल यांच्या ‘टू मच’ या चॅट शोमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन सहभागी झाले होते. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक किस्से सांगितले. आलियाने सांगितले की, तिचा पती रणबीर कपूर तिला नेहमी ट्रोल करतो आणि तिलाही रणबीरला ट्रोल करायला आवडते. ती म्हणाली, “मला ज्याला सर्वात जास्त ट्रोल करायला आवडतं तो रणबीर आहे आणि रणबीरलाही ज्याला ट्रोल करायला आवडतं ती मीच आहे. आमच्यात एक नैसर्गिक बेस्ट फ्रेंडसारखं नातं आहे.” आलियाने पुढे सांगितले की, राहाच्या जन्मानंतर त्यांचं नातं आणखी घट्ट झालं आहे. आता ते दोघे फक्त पती-पत्नी नाहीत तर एक “युनिट” झाले आहेत. तिने हेही उघड केले की त्यांनी मोठ्या ठिकाणी नव्हे तर घरातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. “आम्हाला आमच्या जवळचे लोकच लग्नात हवे होते. त्या दिवशी लोकांना अटेंड करण्यापेक्षा आम्हाला एकमेकांसोबत तो क्षण जगायचा होता,” असे आलियाने सांगितले. कार्यक्रमात वरुण धवननेही वडील झाल्यानंतर आयुष्यात झालेले बदल सांगितले. तर आलियाने रणबीरसोबतच्या मैत्रीपूर्ण नात्याचे काही गोड किस्से प्रेक्षकांसमोर मांडले. या शोमध्ये आलियाने स्पष्ट केले की तिचं आणि रणबीरचं नातं केवळ पती-पत्नीचं नसून, एकमेकांचे खरे मित्र असल्यासारखं आहे.