आळंदी : आळंदी नगरपालिकेने मिळकत कर कोणतीही वाढ करण्यात न आल्याने आळंदीकरांना दिलासा मिळा आहे. पण जर भामा आसखेड योजनेतून आळंदी शहराला पाणी मिळाले तर सध्या 1200 रुपये आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीत वाढ करण्यात येणार आहे.
नगरपालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाचा सुमारे 56 कोटी 51 लाख 64 हजार रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद असलेला व 50 लाख 4 हजार 758 रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत शुक्रवारी (दि. 28) मंजूर करण्यात आला, अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी भूमकर यांनी दिली.
या अर्थसंकल्पात 9 कोटी 72 लाख 76 हजार 158 रुपये आरंभीची शिल्लक रक्कम असून 46 कोटी 83 लाख 92 हजार 600 रुपये अपेक्षित जमा रक्कम धरण्यात आली आहे. एकूण 56 कोटी 56 लाख 68 हजार 758 रुपयांचा अर्थसंकल्प सभेत सादर करण्यात आला.
अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी 2 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 1 कोटी 90 लाख, उद्यान देखभाल दुरुस्तीसाठी 10 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक उभारण्यासाठी 35 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा बंधारा दुरुस्ती व देखभाली करिता 21 लाख, शववाहिका खरेदी करीता 6 लाख, प्रशासकीय वाहन खरेदी करिता 11 लाख, नागरी सुविधा केंद्रकरीता 3 लाख, नगरपालिकेच्या गाळे दुरुस्ती करीता 6 लाख रुपये अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या अंदाजपत्रकात शहराच्या विकासासाठी 56 कोटी रुपये भांडवली व महसुली खर्चाची कामे सुचविण्यात आली आहेत.