प्रभात वृत्तसेवा आळंदी – नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला असून, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांनी आळंदीच्या विकासाचा जो ‘रोडमॅप’ नागरिकांसमोर ठेवला आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केवळ राजकीय अजेंडा नव्हे, तर ‘सामाजिक बांधिलकी’ मानून आळंदीला सुशासन, स्मार्ट सुविधा आणि संतपरंपरेला अनुरूप नवी ओळख देण्याची ग्वाही कुऱ्हाडे यांनी दिली आहे. विविध प्रभागांतील पदयात्रा, सभा आणि घर-घर संवाद मोहिमेत कुऱ्हाडे यांचे विचार आणि आत्मविश्वास पाहून शहराचा कल त्यांच्याकडेच दिसत आहे. विशेषतः महिला, युवक आणि व्यापारी वर्गाने त्यांच्या नेतृत्वावर सकारात्मक मत व्यक्त केले आहे. नागरिकांनी मांडलेल्या पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवर त्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे कुऱ्हाडे यांनी आश्वासन दिले आहे. भाजपच्या या विकास-आराखड्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, आळंदीतील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. विकासाचा रोडमॅप वारकरी केंद्रीत विकास प्रभाग क्रमांक ६ मधील भेटीत कुऱ्हाडे यांनी वाहतूक, स्वच्छता आणि वारकरी सुविधांना केंद्रस्थानी ठेवत आपला विकास आराखडा स्पष्ट केला. नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा आणि इंद्रायणी नदी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सांडपाणी व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. यात्राकाळातील प्रदक्षिणा मार्गासाठी आणि शहरातील वाहतुकीसाठी स्वतंत्र ‘ट्रॅफिक प्लॅन’ तयार करण्याची त्यांची भूमिका आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था आणि मेडिकल हेल्प पॉईंट्स उभारण्यावर त्यांचा भर असणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचे जाळे आणि खास पथके, तसेच तरुणांसाठी कौशल्यविकास केंद्रे व स्थानिक उद्योगांशी समन्वय साधून रोजगारनिर्मितीची योजना त्यांनी मांडली आहे. “आळंदीने धार्मिक वारसा जपावाच, पण त्यासोबत आधुनिकतेकडेही वाटचाल करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच विकासाचा वेग वाढेल.” – प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, भाजप