अभिनेता अक्षय कुमारने आपल्या 52 व्या वाढदिवशी शूर योद्धा आणि राजा पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. “पृथ्वीराज’ असे चित्रपटाचे नाव असून 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. अक्षय आपला ड्रीम प्रोजेक्टवर काम करणार आहे. महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो झळकणार होता. मात्र , या चित्रपटालाही लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. दहीसर येथे कोट्यवधी रुपये खर्चून चित्रपटाचा मोठा सेट उभारण्यात आला. मात्र आता मुंबईत मान्सून दाखल होण्यापूर्वी हा सेट पाडण्यात येणार असल्याचं कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार,चित्रपटाच्या दिग्दर्शकाने गेले दोन महिने वाट पाहिली. दोन महिन्यांनंतर कदाचित शूटिंगला सुरुवात होईल, या आशेने त्यांनी सेट तसाच ठेवला होता. मात्र आता मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. आधीच लॉकडाउनमुळे झालेलं नुकसान आणि त्यात पावसामुळे होणाऱ्या सेटच्या नुकसानीची भर पडायला नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, यशराज फिल्म अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार असून डॉक्टर चंद्र प्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.यावर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसचं संकट आणि लॉकडाउन यामुळे चित्रपटाचं प्रदर्शनही पुढे ढकलण्यात येऊ शकतं.