मुंबई : नागपूर आणि अकोला विधान परिषदेच्या २ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल आज समोर आले. त्यात भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का देत विजय मिळवला आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपानं या दोन्ही जागा मोठ्या फरकानं जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. अकोल्यातील निकालांवरून भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
नागपूर निवडणुकीत ऐनवेळी घोडेबाजार होऊन देखील भाजपाचाच विजय झाल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. “नागपूर आणि अकोल्याच्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपासून ज्या निवडणुका झाल्या, त्यात राज्यातील जनतेनं प्राधान्य भाजपाला दिलं.
"विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!
६ पैकी ४ जागी दमदार विजय मिळवत केला महाविकास आघाडीचा दारुण पराभव.
या यशाबद्दल भाजपाच्या सर्व विजयी उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन!"#MLCElectionResults2021 #BJP4Maharashtra pic.twitter.com/9JTohOD3z1— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 14, 2021
नागपूरच्या बाबतीत उमेदवार बदलणं आणि घोडेबाजार करूनही मतदारांनी भाजपालाच पाठबळ असल्याचं दाखवून दिलं. वसंत खंडेलवाल यांच्याकडेही वंचित, श्रमिक घटकांनी भाजपाच्या मागे उभे असल्याचं दाखवून दिलं. १७६ मतांनी बावनकुळे आणि १८६ मतांनी वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत”, असे दरेकर म्हणाले आहेत.
“जनतेत जी प्रचंड नाराजी होती, त्याचं प्रतिबिंब नागपूर आणि अकोल्यात उमटलं. सरकार म्हणून राज्यकारभार करण्यात हे सरकार अपयशी ठरलंय, त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीत आलं आहे. या सरकारची सरकार चालवण्याची क्षमता नाही याची चर्चा राज्यभर होतेय हे या निवडणुकांनी दाखवून दिलं”, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंची काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरू असल्याचं म्हटलं आहे. “नाना पटोलेंची मनमानी आणि एकाधिकारशाही काँग्रेसमध्ये चालू आहे. त्याचं प्रत्यत्तर या निवडणुकांमध्ये दिसतंय. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे हे पुन्हा दिसून आले आहे.
नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर स्थानिक काँग्रेसची नाराजी आहे. उमेदवारी बदलल्यानंतर त्या उमेदवाराने मुद्दा प्रतिष्ठेचा केला. नागपूरची बुद्धिजीवी वैचारिक भूमिका असणारे मतदार भाजपाच्या मागे उभे राहिले. नाना पटोलेंच्या एकाधिकारशाहीचा काँग्रेसच्याच लोकांनी पर्दाफाश केल्याचं दिसून आलं आहे”, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
“आमच्या मतापेक्षा जास्त मतं पडली. काँग्रेसची मतं फुटली. हे सरकार पूर्णपणे वसुली सरकार आहे. भ्रष्टाचाराने पोखरलेलं सरकार आहे. अशा वेळी जनतेनं रोष दाखवून दिला की तुम्ही काम करण्याच्या योग्यतेचे नाही”, असेही ते म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी पक्षात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्रीपद असताना गावापासून वरपर्यंत ज्या निवडणुका होत आहेत तिथे शिवसेनेची अधोगती होताना दिसत आहे. अशा वेळी पक्षाचा अकोल्याचा आमदार पडतो, यावरून शिवसेनेचा काऊंटडाऊन कसा होतोय, हे अधोरेखित झालं आहे”, अशा शब्दात प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
दरम्यान प्रविण दरेकर यांच्याप्रमाणेच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी देखील या विजयावरून महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.