लखनौ : बिहारमध्ये विशेष सघन पुनरावलोकन अर्थात एसआयआर प्रभावहीन राहील. हा खेळ आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतरत्र शक्य होणार नाही. निवडणूक जिंकण्यासाठीचा हा एक कट असल्याचे आता उघड झाले आहे. आम्ही त्यांना हा खेळ आता खेळू देणार नाही, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे. बिहार निवडणूक निकालांमधील ट्रेंडमुळे विरोधी पक्षाच्या छावणीत खळबळ उडाली आहे. काँग्रेस दिल्ली कार्यालयाबाहेर मतदान चोरीचा आरोप करणारे पोस्टर्स लावून निदर्शने करत असताना, उत्तर प्रदेशात, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा (SIR) वर भाजपवर हल्लाबोल केला आहे. अखिलेश यादव असेही म्हणाले की, सीसीटीव्हीप्रमाणे, आमचे पीपीटीव्ही म्हणजेच पीडीए-प्रहारी सतर्क राहतील आणि भाजपच्या योजना हाणून पाडेल. भाजप हा पक्ष नाही, तर एक फसवणूक आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आक्षेपार्ह होती आणि त्याविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल, असे दिसते. यापूर्वीही अखिलेश यादव एसआयआरविरुद्ध विधाने करत आहेत. अलिकडेच, यादव यांनी सांगितले की, मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्तीमध्ये आधारला मान्यता देण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात जातील. अनेक ठिकाणी २००३ ची मतदार यादी अस्पष्ट आहे. आम्ही पीडीएची मते कापू देणार नाही.