लखनौ : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने केवळ निवडणुकीपुरते नवरदेव बनवले आहे. निवडणुकीनंतर नितीश मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची पसंती नसतील, असे भाकीत समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले. बिहारमध्ये निवडणूक ज्वर शिगेला पोहचला आहे. अशात त्या निवडणुकी संदर्भात उत्तरप्रदेशच्या गाझीपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना अखिलेश यांनी जोरदार शाब्दिक टोलेबाजी केली. राजकीय खेळीचा भाग म्हणून भाजप नितीश यांचा वापर करत आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवण्याची विरोधकांच्या इंडिया आघाडीची तयारी होती. आज ते केवळ निवडणुकीपुरते एनडीएचा चेहरा बनले आहेत. बिहारच्या जनतेला सर्वकाही ठाऊक आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर काय घडले ते आठवा. निवडणुकांआधी ज्यांना चेहरा बनवण्यात आले; त्यांना नंतर मुख्यमंत्री बनवण्यात आले नाही. तसेच बिहारमध्येही घडेल. एनडीएने सत्ता राखली तरी भाजप नितीश यांना मुख्यमंत्री बनवणार नाही, असा दावा त्यांनी केला. अर्थात, बिहारला बदल हवाय. त्यामुळे त्या राज्यात विरोधकांची महाआघाडी बाजी मारेल. राजदचे नेते तेजस्वी यादव पुढील मुख्यमंत्री असतील, असा विश्वासही अखिलेश यांनी व्यक्त केला.